ग्रा.पं. निवडणूक:जिल्ह्यात 117 ग्रामपंचायतींसाठी झाले 67.64 टक्के मतदान; मतदारांत उत्साह.




प्रतिनिधी/शाहिद शहा 

जिल्ह्यातील ११७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रविवारी ४१२ मतदान केंद्रांवर ६० हजार ८७६ महिला महिला व ६३ हजार ८०१ पुरुष मतदार असे एकूण १ लाख २४ हजार ६७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात ६७.९४ टक्के मतदान झाले. तळोद्यात सर्वाधिक ८४.८५ टक्के तर अक्राणी तालुक्यात ५७.९३ टक्के मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.

नंदुरबार जिल्ह्यात १२३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घाेषित झाला हाेता. माघारीनंतर त्यात अक्कलकुवा १, अक्राणी ३, नंदुरबार १, नवापूर १ अशा एकूण सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तसेच उर्वरित ११७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी ४१२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले.

वृद्धांमध्ये उत्साह; करणखेड्यातील बूथवर सर्वाधिक मतदान
आसाणे येथे व्हील चेअरवरून आलेल्या दिव्यांग वयोवृद्ध मतदाराने दुपारी १२ वाजेच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. सातुर्के येथेही दिव्यांग व्यक्तीने मतदानाचा अधिकार बजावला. चौपाळे येथे बायजाबाई निकाळजे (वय १००) या वयोवृद्ध महिलेने मतदानाचा हक्क बजावला. या महिलेस अन्य दोघा महिलांनी केंद्रावर आणले होते. करणखेड्यात एका बूथवर सर्वाधिक ९५.७१ टक्के मतदान झाले. तेथे १२ हजार २३० पुरुष मतदारांनी तर ११ हजार ७८५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात सर्व १७ ग्रा.पं.साठी ८२.६१ टक्के मतदान झाले.

धानाेऱ्यात मतदानास फटका : धानोरा मतदार संघात एक मतदान यंत्र तांत्रिक बिघाडामुळे दीड तासापेक्षा जास्त वेळ बंद पडले. मतदानासाठी उत्स्फूर्तपणे आलेल्या मतदारांना या प्रकाराचा फटका बसला. बराच वेळ ताटकळत रहावे लागल्याने ते त्रस्त झाले. मात्र हा एक अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. तेथील केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.

नंदुरबार तालुक्यात ८२.६१ % मतदान
तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. १२ हजार २३० पुरूष व ११ हजार ७८५ महिला असे एकुण २४ हजार १५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. धानाेरा येथे एका मतदान केंद्रात दीड तासापेक्षा अधिक वेळ मतदान यंत्र बंद पडले. हा अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. एकूण ८२.६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी मंगळवारी होणार असून लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे. तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० वाजता मतदानास प्रारंभ झाला.

सकाळी ९.३० वाजेपर्यंत सरासरी १२.०४ टक्के मतदान झाले हाेते. तर सकाळी ९.३० नंतर ११.३० वाजेपर्यंत हा आकडा ३३.०५ टक्क्यांवर पोहाेचला. दुपारी १.३० वाजता मतदानाचा टक्का ५३.१२ टक्क्यांपर्यंत पोहाेचला. सहा तासांत निम्म्यापेक्षा जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे समाधानकारक चित्र होते.

दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६९.८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला हाेता. अोसर्ली, तलावडी या ग्रामपंचायतींमध्ये सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार राजेश अमृतकर, नितीन पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेचे उत्तम असे नियोजन केल्याचे पहावयास मिळाले.


ग्रामपंचायती बिनविरोध:धडगाव तालुक्यातील 44  ग्रा.पं.साठी 78.25  टक्के मतदान



तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या रविवारी झालेल्या निवडणुकीसाठी ७९.०३ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर उमेदवारी माघारीच्या अखेर एकूण तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यात सावऱ्यादिगर, शिरसानी व शेलदा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

उर्वरित ४४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले.या निवडणुकीत एकूण ५१ हजार १४७ मतदारांपैकी ४० हजार २३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात १९ हजार ४४० महिला मतदार तर २० हजार ५८३ पुरुष मतदारांचा समावेश आहे. . येथील तहसील आवारात मंगळवारी मतमोजणी केली जाणार आहे.


१५ ग्रा.पं.साठी सुरळीत पार पडली प्रक्रिया:नवापूर तालुक्यामध्ये 84 टक्के मतदान

तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी सरासरी ८४ टक्के मतदान झाले. मतदानासाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच वेळ असताना उशीरापर्यंत मतदान सुरू हाेते. नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रा.पं.साठी सहा वाजेपर्यंत तर खडकी ग्रुप ग्रा.पं.च्या ५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर पिंपळा येथे सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदान सुरू हाेते.

पिंपळे मतदान केंद्रावर १ हजार ९२ पैकी ९६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक अधिकाऱ्यांनी साडेसात वाजेपर्यंत मतदारांना रांगेत उभे करून चिठ्ठीवर क्रमांक लिहून मतदानाची प्रक्रिया राबवली. मतदारांची संख्या जास्त असल्याने या केंद्रावर दोन बूथ निर्माण करण्याची मागणी मतदारांनी केली आहे. नांनगीपाडा ग्रा.पं.साठी साडेतीन वाजेपर्यंत ९२ टक्के मतदान पूर्ण झाले हाेते. सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान केल्याने ही टक्केवारी वाढवली आहे.

तेथील ६६१ पैकी ६०७ मतदारांनी मतदान केले. तालुक्यातील सर्वात मोठ्या विसरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले आहे. एकूण ४ हजार ५७६ पैकी २ हजार ९७६ मतदारांनी मतदान केले. तेथे लाेकनियुक्त सरपंच पदासाठी २ तर सदस्यांसाठी जवळपास ३२ उमेदवार रिंगणात आहे.


🔴🟢🟣🟠⚪🟡🟤⚫🔵🟣🟢🔴🟤🟡

Post a Comment

Previous Post Next Post